पुणे : ‘अगदी गर्भात असल्यापासून ते लहानपणी गोष्ट सांगत, ऐकत मोठे होण्यापर्यंत आपण कथेतच रमतो. कथा आपल्याला शिकवतात, प्रेरणा देतात. त्यामुळे कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो,’ अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक मिलिंद शिंत्रे यांनी साहित्यातील कथांचे महत्त्व स्पष्ट केले. मूळची पुणेकर असलेली आणि सध्या ऑस्ट्रेलियास्थित असलेली तरुण इंजिनीअर दीप्ती मडी हिने लिहिलेल्या ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा - मंचल’ या कथासंग्रहाचे प्रकाशन पुण्यातील वारी बुक कॅफेमध्ये २६ डिसेंबर रोजी झाले. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने शिंत्रे बोलत होते.
लिट्रेझर पब्लिशर्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, ‘बुकगंगा’ने त्याचे ई-बुक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमाला शिंत्रे यांच्यासह अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, लिट्रेझर पब्लिशर्सचे चेतन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सिडनीमधील रोजच्या आयुष्यातील, नोकरीतील धावपळ आणि एकीकडे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरच्या आभासी जगातही प्रत्यक्ष संवादाची, अनुभव सांगण्याची दीप्तीची आवड हेरली. ती पुस्तकरूपाने व्यक्त होण्यासाठी कोणतीही अडचण येऊ न देण्याचा प्रकाशक या नात्याने मनापासून प्रयत्न केले,’ असे जोशी यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
पुस्तक व ई-बुकच्या प्रकाशनाचा ‘वारी’च्या ओसरीवर रंगलेला हा अनौपचारिक सोहळा रश्मिता शहापूरकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने अधिकच खुलला. ‘बुकगंगा’च्या प्रतिनिधी मनीषा लेले यांनी ई-बुक प्रकाशित करण्यामागची ‘बुकगंगा’ची भूमिका, तसेच ‘बुकगंगा’च्या विविध उपक्रमांबद्दल सांगितले. तसेच हे पुस्तक ‘ऑडिओ बुक’ रूपात प्रकाशित करण्याची इच्छाही प्रदर्शित केली.
‘कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने दीप्तीने आपली अभिव्यक्ती कथासंग्रहाच्या रूपात सादर केली. याचा मला विशेष आनंद आहे,’ असे मिलिंद शिंत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
‘‘माझे पुस्तक, एखादे सुंदर गाणे आणि तुमची वाफाळती कॉफी’ हे असे विलक्षण जग निर्माण करण्याची जिची प्रेरणा आहे, स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत रममाण असलेल्या पिढीतही स्वतःला व्यक्त करण्याची धडपड करणाऱ्या माझ्या लेखक मैत्रिणीला भरभरून शुभेच्छा आहेत,’ अशा शब्दांत मधुराणी प्रभुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीप्तीची मैत्रीण आणि अभिनेत्री म्हणून नव्हे, तर लेखिका या नात्याने मधुराणीने आपल्या गप्पांमधून दिलखुलासपणे तिच्या पुस्तकाचे परीक्षण केले. ‘संपूर्ण पुस्तक वाचताना दीप्तीच्या शब्दांत आपण हरवून जातो; पण त्यात कुठेही शब्दांचा फापटपसारा, पाल्हाळ नाही, तर संक्षिप्तता आणि सुटसुटीतपणा हे दीप्तीच्या कथांचं वैशिष्ट्य आहे. तिने शब्दाद्वारे निर्माण केलेले प्रत्येक पात्र पारदर्शी आहे. कुठे गुंतागुंत नाही. भावनांचा ‘लोचा’ नाही. तरीही कथेतील नाट्य, नात्यांमधील तणाव दीप्तीचे शब्द अचूकपणे हेरतात. वास्तविक परदेशात स्थायिक झालेल्या मराठी लेखकांच्या लेखनात सन २०००नंतरचा ‘केऑस’ (गोंधळ) आढळतो. दीप्तीच्या लेखनात तो कुठेही नाही. कारण तो गोंधळ तिच्या मनातही नाही. तिच्या मनाचं लास्ट लोकेशन पुणे आहे, असे जाणवत राहते. निरीक्षण, बोलीभाषेचा वापर आणि सहज कथनशैली ही तिच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. ‘ए प्रोफेशनल रायटर हू इज अॅन अमॅच्युअर हू नेव्हर क्विट्स’ या उक्तीप्रमाणे तिने तिचा लेखनप्रवास कथासंग्रहापासून पटकथेपर्यंत चालू ठेवावा,’ असे मधुराणी म्हणाली.
कागदावर उतरलेले शब्दांपासून पुस्तकांपर्यंतचा प्रवास सांगताना दीप्तीने डिसेंबरमधील शेवटच्या आठवड्यात भारतात घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये आपण हरवून गेल्याचे सांगितले. ‘आतापर्यंत कायम ‘इंटरनॅशनल’मध्ये पुस्तक विकत घेणाऱ्या मला ‘बुकगंगा इंटरनॅशनल’च्या डिस्प्लेमध्ये माझे पहिले नवे पुस्तक पाहण्याचा आनंद अवर्णनीय होता,’ अशा शब्दांत दीप्तीने आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांचीही उत्स्फूर्त दाद मिळाली.
(‘मंचल’ हा कथासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)